no images were found
माय भारत विशेष नोंदणी अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ
युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर, : देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. दि. १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना माय भारत पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास, कौशल्यविकास, अनुभवाधारित शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
युवकांना www.mybharat.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून माय भारत पोर्टलवर सहज नोंदणी करता येणार आहे. माय भारत हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व विकास, कौशल्यवृद्धी आणि विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवती, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), शैक्षणिक संस्था तसेच युवक संघटनांनी या विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेरा युवा भारत, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अभियानादरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने माय भारत पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी केले आहे.