no images were found
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापना-क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार,-४ क्लब ऑफिसर्स व २० सायबर वॉरियर्सची निवड
कोल्हापूर(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीयता, ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण तसेच जबाबदार डिजिटल नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ आणि पुणे येथील क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमांतर्गत नुकताच ऑनलाइन सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कराराद्वारे विद्यापीठात ‘सायबर वॉरियर्स क्लब’ची स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी ४ क्लब ऑफिसर्स व २० सायबर वॉरियर्सची निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात तसेच विविध शाळा, महाविद्यालये आणि समाजामध्ये सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, डिजिटल गोपनीयता आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याविषयी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. यासाठी विशेष मोहिमा, कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, वेबिनार आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सायबर वॉरियर्स क्लबच्या २०२६–२७ या वर्षाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून यामध्ये शिवम गिरी (प्रेसिडेंट), साकीब सय्यद (सेक्रेटरी), नंदन गायकवाड (अॅक्टिव्हिटी डायरेक्टर) आणि ऋषिकेश खाडे (मीडिया डायरेक्टर) यांची निवड करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर विद्यापीठात सायबर सुरक्षेचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू असून, श्री. अजय शिर्के यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तर सौ. गायत्री केसकर आणि श्री. दिपू सिंग यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध आणि जबाबदार इंटरनेट वापराबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.
कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत म्हणाले, विद्यार्थ्यांना बदलत्या डिजिटल जगासाठी सक्षम बनविन्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. सायबर वॉरियर्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी समाजातही प्रभावी जनजागृती करतील.
कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. या उपक्रमामुळे सुरक्षित, जबाबदार आणि नैतिक डिजिटल नागरिक घडविण्यास मोठी मदत होईल. विद्यापीठ नेहमीच अशा उपक्रमांना प्राधान्य देईल.
विद्यापीठाचे शिक्षक समन्वयक अभिजित शिंदे व डॉ. विद्या बडदारे यांनी या उपक्रमाचे समन्वय केले कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र-कुलपती श्री. ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.