Oplus_131072
no images were found
पद्मभूषण वि. स. खांडेकर पुतळा सुशोभीकरणाचे लोकार्पण नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
कोल्हापूर, : मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण वि. स. खांडेकर यांच्या कार्याला अभिवादन करणाऱ्या टाकळा चौकातील पुतळा सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने साहित्य, संस्कृती आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने कोल्हापूरने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “वि. स. खांडेकर हे केवळ कोल्हापूरचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहेत. त्यांच्या साहित्याने अनेक पिढ्यांना विचारांची दिशा दिली आहे. त्यांच्या स्मृतींना साजेसे सुशोभीकरण करून साहित्यिक वारसा जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण केवळ पुतळ्यांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.”
साहित्यरत्न वि. स. खांडेकर यांच्या स्मृतींना साजेशी ही कलात्मक निर्मिती कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ठरेल, असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि KSBP च्या माध्यमातून हा प्रकल्प अवघ्या आठ दिवसांत पूर्ण करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जाधव यांनी आगामी काळात देखील KSBP च्या माध्यमातून अशाच पद्धतीने शहरातील विविध ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पूर्वी अत्यंत साध्या स्वरूपात असलेला पुतळा आता आकर्षक आणि कलात्मक स्वरूपात उभा राहिल्याने टाकळा चौकाचा संपूर्ण कायापालट झाला असून तो शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरत आहे. सुशोभीकरणामध्ये कोकणातील चिरे दगडाचा वापर करण्यात आला आहे. वि. स. खांडेकर यांचे शिरोडा (कोकण) येथील वास्तव्य लक्षात घेऊन ही संकल्पना साकारण्यात आली. तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानाचे प्रतीक म्हणून लेखणीच्या प्रतिकृती, त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची नावे, पुस्तकांचे शिल्प आणि सरस्वती मातेची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. आकर्षक फुलझाडांमुळे स्मारकाची शोभा अधिक खुलली आहे.
यावेळी विजय जाधव यांनी टाकळा चौकास “वि. स. खांडेकर चौक” असे नामकरण करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती दिली.
कार्यक्रमास कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनिश कामत, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लव्हटे, आंतरभारतीच्या पल्लवी कोरगावकर, डॉ. संजय देसाई, भाजपा गटनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विजयेंद्र माने, प्रमोद देसाई, संजय मोहिते, नीलिमा पाटील, सृष्टी जाधव, अर्चना कोराने, दीपा ठाणेकर, निलांबरी साळोखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजपा पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.