no images were found
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरण महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा देणारे-डॉ.हुलगेश चलवादी
नियंत्रण यंत्रणा ‘एनटीए’चे मोठे अपयश; ‘आरपीआय’ विद्यार्थ्यांच्या पाठीशी
पुणे,: देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर फुटीमुळे सर्वोच्च परीक्षा नियंत्रण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता भंग पावल्याची घटना नसून, संपूर्ण शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणेचे हे अक्षम्य अपयश आहे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) प्रदेश उपाध्यक्ष तसेच चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.१९) व्यक्त केले.
नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबामागे आरपीआय खंबीरपणे उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार दोषींना सोडणार नसल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
संपूर्ण गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट महाराष्ट्रात रुजल्याचे समोर आल्याने राज्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणि राज्य पोलिसांनी महाराष्ट्रातून प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (लातूर), लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराम मोटेगावकर, नाशिकमधून शुभम खैरनार, पुण्यातून मनीषा वाघमारे आणि मनीषा मंधारे, तसेच अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे अशा प्रमुख संशयितांना अटक केली आहे.
यंत्रणेतील अंतर्गत त्रुटी, काही परीक्षा तज्ज्ञांनी केलेला विश्वासघात आणि वाढता भ्रष्टाचार यामुळेच हे रॅकेट इतके फोफावले, हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ वरवरची चौकशी करून चालणार नाही, तर या संपूर्ण यंत्रणेचे ‘ऑडिट’ करून मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. जोपर्यंत परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवणे अशक्य आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.