no images were found
महानगरपालिका आपले घर समजून काम करा – महापौर सौ.रुपाराणी निकम
:दर महिन्याच्या पाच तारखेला मुख्य चौकात जनता दरबार; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविणार
कोल्हापूर,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हे आपले घर समजून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जबाबदारीने काम करावे, असे आवाहन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिकाच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक घेत चांगल्या कामाचे निश्चित स्वागत केले जाईल, असे स्पष्ट केले. येत्या आठ दिवसांत प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील. पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासन यांचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत. येथून पुढे चुका होऊ नयेत, सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, असेही त्या म्हणाल्या. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी आपण दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेत उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले. केंद्र व राज्यात युतीची सत्ता असल्याने महापालिकेच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मिटींगमध्ये वेळ न घालवता सर्वांनी प्रत्यक्ष काम करावे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला महापालिकेच्या मुख्य चौकात जनता दरबार भरविण्यात येणार असून त्या दिवशी कोणताही अधिकारी अनुपस्थित राहता कामा नये, अशी सक्त सूचना त्यांनी दिली. महापालिकेतील सर्व प्रकल्पांची सविस्तर माहिती लवकरात लवकर सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करत त्यांनी विशेष स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. स्वच्छता विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री देण्याची गरज व्यक्त केली. अतिक्रमणमुक्त व स्वच्छ शहरासाठी आठ दिवस स्वतंत्र वाहनाद्वारे जनजागृती करण्यात यावी. मुदत संपल्यानंतर मुख्य रस्ते, बंद गाड्या व इतर अतिक्रमणांवर तातडीने कारवाई सुरू करावी, असे त्यांनी सांगितले. रस्त्यांची कामे करताना प्रथम ड्रेनेज, पाणी लाईन व गटर्सची कामे पूर्ण करूनच रस्ते करावेत. अन्यथा रस्ता खुदाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. महापालिकेतील सत्कारप्रसंगी बुकेऐवजी पुस्तक, सन्मानचिन्ह किंवा पेन देण्याची पद्धत अवलंबावी. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीएसआर निधीतून उद्यानांचा विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. रस्त्यांच्या दुभाजकावरील खराब झाडे काढून त्या ठिकाणी आयुर्वेदिक झोन विकसित करून तुळस व इतर औषधी वनस्पती लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अतिक्रमण विभाग सक्षम करण्याच्या सूचना देत स्पीकरद्वारे आवाहन करून मुदत देऊन कारवाई करावी, असे निर्देश दिले. रस्त्यावर थुंकणाऱ्या व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाय म्हणून स्वतंत्र डॉग शेल्टर उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हेरिटेज व पर्यटन स्थळांवर स्वच्छता व विद्युत रोषणाई करावी. अनधिकृत खाऊ गल्ल्यांशेजारील रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई करावी. महिलांसाठी स्वच्छतागृहांसाठी जागा निश्चित करावी; जागा उपलब्ध नसल्यास अत्याधुनिक फिरते शौचालय उपलब्ध करावीत. तसेच वर्कशॉपमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
उप–महापौर अक्षय जरग यांनी शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश दिले. शहरातील उद्यानांची दुरावस्था लक्षात घेता वॉचमन नियुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापौरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्यावतीने दोन डॉग शेल्टर उभारण्यात येणार आहे. सर्वांच्या अडचणी सोडवत सकारात्मक दृष्टीकोनातून टीमवर्कने काम करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करूया, असे ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्यलेखाधिकारी श्रीमती राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, नगरसचिव सुनिल बिद्री व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.