no images were found
राज्य महिला आयोगातर्फे उद्या विद्यापीठात ‘सक्षमा’ कार्यक्रम:महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
कोल्हापूर,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” – महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन उद्या, शुक्रवारी (दि. २३) जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात करण्यात आले आहे. ही माहिती विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी दिली आहे.
डॉ. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा २०१३ (पॉश कायदा) आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा (पीसपीएनडीटी) यांबाबत जनजागृती, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलनातून महिलांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या “सक्षमा” कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेली २७० महाविद्यालये व संस्थांमधील ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’चे (ICC) अध्यक्ष, सदस्य, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियान समितीचे सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात नोकरदार महिला व विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान करणारा ‘पॉश’ कायदा नेमके काय सांगतो, यावर प्रा. डॉ. भारती पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची रचना, कार्ये, अधिकार आणि तक्रारींवर कार्यवाही करण्याची पद्धत यांबाबत अनुभवी कायदेतज्ज्ञ साधना खटी संवाद साधतील. तसेच, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये चाचणीद्वारे लिंगनिदान करणे हा गुन्हा आहे, यावर डॉ. सुनील कुबेर, गीता हसुरकर आणि ॲड. गौरी पाटील संबोधित करतील. अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरणासाठी आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन का आवश्यक आहे, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या ॲड. सीमा पाटील आणि नंदिनी जाधव आपले विचार मांडतील.