no images were found
‘आरपार’ चित्रपटामधील ‘जागरण गोंधळ’ गाणं घेतंय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव
कोल्हापूर-जागरण गोंधळ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्र्रात विविध ठिकाणी भक्तिभावाने जागरण गोंधळ केला जातो. प्रत्येकाची यामागची श्रद्धा, भक्ती, नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचदा प्रथा म्हणूनही जागरण गोंधळ केला जातो. अशातच सध्या एका जागरण गोंधळाच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘आरपार’ या सध्या चर्चेत असलेल्या सिनेमातील हे जागरण गोंधळ गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक या गाण्यातून समोर आला आहे ज्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अर्थात, या गाण्यात ललितची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे.
‘आरपार’ सिनेमातील या गाण्यात ललित तुटलेल्या हृदयाने देवीचा जागरण गोंधळ मांडताना दिसत आहे. ललित आणि ऋताचं ब्रेकअप झाल्याचं या गाण्यातून स्पष्टपणे दिसतंय.
ती निघून गेल्यावरही जेव्हा तिच्या आठवणी त्याला सोडत नाहीत, तेव्हा या जागरण गोंधळातून ललित आपली व्यथा मांडत मन मोकळं करताना दिसत आहे. यांत त्याला त्या दोघांच्या भूतकाळच्या आठवणी सतत सतावत आहेत. आणि अशा तुटलेल्या हृदयाने तो या जागरण गोंधळातून देवीचा धावा करताना दिसत आहे.
या गाण्याला लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवेंचा आवाज लाभला आहे आणि या गाण्याचे बोलही त्यांचेच आहेत. त्यामुळे हे गाणं रसिक प्रेक्षकांना आवडलं आहे. या गाण्याच्या संगीताची धुरा गुलराज सिंग यांनी सांभाळली आहे. जागरण गोंधळ म्हटलं की संबळ हे आलंच. या संबळाची धुरा विकास कोकाटे यांनी सांभाळली आहे. ‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन्स एलएलपी’ प्रस्तुत, नामदेव. नि. काटकर आणि रितेश. मो. चौधरी निर्मित, ‘आरपार’ या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा ऋता दुर्गुळे व ललित प्रभाकर या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.