no images were found
अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर, : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून अवयवदान पंधरवडा दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सुरु आहे. याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी व आरोग्य सेवकांनी सहभागी होत अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी अवयवदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरित केले. या वेळी सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधील प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.योगेश साळे म्हणाले, अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचू शकते. त्यामुळे प्रत्येकाने या बाबतीत सकारात्मक विचार ठेवावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या कीर्ति रूपे उरावे या विशेष अवयवदानाची चळवळीचा उल्लेख या ठिकाणी केला. सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना अवयव दान विषयी आवाहन केले.
मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्यास तयार असल्याची प्रतिज्ञा 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात घेतली. यामुळे समाजात अवयव दानाबाबत जागरुकता वाढेल. प्रतिज्ञेचे वाचन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर कडील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक भोई यांनी केले.