
no images were found
व्यापक दृष्टिकोन अंगीकारून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवा – जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : प्रत्येक विभागाने व्यापक दृष्टिकोन अंगीकारून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविला गेला. त्यानंतर, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूर अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम राबविला जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात सर्व विभागप्रमुख आणि तालुका विभागप्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शरद मगर, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम) तुषार बुरुड, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच, दूरदृष्यप्रणालीद्वारे तालुका आणि उपविभागीय स्तरावरील सर्व अधिकारी सहभागी झाले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या नावाने कृती कार्यक्रम राबविण्यास निश्चित केले आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सकारात्मक आणि प्राधान्याने सहभागी होऊन यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय योगदान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. या अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण होऊन त्यांचे जीवनमान सुकर होण्यास मदत होईल. अभियानाचा कालावधी 1 मे 2025, महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट 2025, स्वातंत्र्य दिन असा आहे.
या बैठकीत जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळ आणि डॅशबोर्डची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. तसेच, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शरद मगर यांनी अभियानाची कालबद्ध आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. बैठकीत दोन्ही कृती कार्यक्रमांचे घटक आणि तपशील सांगण्यात आले. तसेच, डॅशबोर्डवर कशाप्रकारे माहिती भरावी याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.