
no images were found
लोकाभिमुख, गतिशील व पारदर्शक कामकाज करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर,(प्रतिनिधी) :- राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये प्रत्येक शासकीय योजना, शासकीय लाभ जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नागरीकांना सेवा देताना अधिक सुलभ सेवा देऊन लोकाभिमुख, गतिशील व पारदर्शक कामकाज करा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या. महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात दुपारी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बैठक घेऊन पुढील शंभर दिवसांचे नियोजन करण्याबाबच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या सर्व अधिकारी यांची याबाबत बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे, उज्वला शिंदे, शहर अभिंयता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनिल बिद्रे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता आर के पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत उपस्थित होते.
राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगितला. यामध्ये आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाणारी माहिती उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. महापालिकेच्या सर्व कार्यालयांची स्वच्छता करा, सर्व विभागांशी रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील याची काळजी घ्या. प्रलंबित कामे व तक्रारींची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करा. कार्यालयातील व सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन स्वच्छता करा. नागरिकांना महापालिकेतील कार्यालयांची माहिती होण्यासाठी नकाशा लावा. नागरीकांना भेटण्याची वेळ ठरवून त्या दिवशी जागेवर संबंधीतांनी उपस्थित रहावे. नागरीकांना जास्तीजास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन दया. पेपरलेस कामकाज करण्यासाठी ई ऑफिसद्वारे 100 टक्के करण्याचा प्रयत्न करा. प्लॅस्टिक बंदीची काटेकोर पालन करावे. प्रत्येक कार्यालयात आलेल्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे असावी. या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक घटकाचे अगोदरचे छायाचित्र व नंतरचे छायाचित्र काढून त्याचा अहवाल तयार करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.