
no images were found
वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार, वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार आहेत. वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्याचे संरक्षण करणे प्रत्येक मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असतात अशावेळी त्यांना त्यांच्या अधिवासात सुखरुप सोडणे अत्यंत गरजेचे असते. तसेच वन्यप्राणी नुकसानीच्या घटना घडतात त्याबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या नियोजित बावडा-शिये रोड, मौजे शिये येथील नवीन कार्यालयाचे भूमीपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते आज संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय वनअधिकारी वन्यजीव श्रीकांत पवार, सहयाद्री व्याघ्र राखीव वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक उत्तम सावंत, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) श्री. गुरुप्रसाद, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) एस.डी. गवते तसेच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, पर्यावरण टिकवायचे असेल तर प्राण्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चांगले अभयारण्य उभे राहावे, यातून पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांचे अधिनस्त उपसंचालक (कोयना) सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, उपसंचालक (चांदोली) सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर व विभागीय वनअधिकारी वन्यजीव कोल्हापूर ही कार्यालये येतात. कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येतात. पश्चिम घाटातील सहयाद्री पर्वत रांगा व तेथिल घनदाट जंगल प्रदेश पासून ते राधानगरी अभयारण्यापर्यंतचे जंगल हे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र आहे. या जंगलात प्रामुख्याने वाघ तसेच बिबटया, गवा, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, पिसई, शेकरु, सायाळ, उदमांजर, वानर, सरसू, रानकूत्रा, ससा, कोल्हा, मुंगुस, खवल्या मांजर इत्यादी वन्यप्राणी आढळतात. तसेच विविध वनसंपत्तीने व जैवविविधतेने सदरचा भूप्रदेश संपन्न आहे. अशी माहिती विभागीय वनअधिकारी वन्यजीव श्रीकांत पवार, यांनी दिली.
**