
no images were found
खऱ्या अर्थाने साजरी होणार दिवाळी !
२२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील राम मंदिरात करण्यात येणार आहे. हा दिवस अवघ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. तसंच, २२ जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचं ठरवलं आहे.
२२ जानेवारी दिवाळी साजरे करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर विरोधकांनी आनंदाचा शिधा वाटण्याचे उपहासात्मक आवाहन केले होते. तसंच, राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी देशभर आतिषबाजी करण्यात येणार असून शासकीय इमारतींना रोषणाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अर्थ देशभर सर्वत्र दिवाळीचा महौल असणार आहे.
राज्यातील अनेकांनाही राम मंदिर कार्यक्रमाचे आमंत्रण आले आहे. तर, राज्यातील अनेक रामभक्त अयोध्येच्या दिशेने जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील सामान्य नागरिकांनाही या दिनाचा सोहळा करता यावा याकरता राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात एक्सद्वारे माहिती दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य सरकारची जनतेला आनंददायी भेट. महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज सर्वसामान्य नागरिकांना आनंदाची भेट जाहीर केली. प्रभू श्रीरामाच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांनाही आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळानचे हे निर्णय म्हणजे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे व लोककल्याणकारी आहे, याचीच साक्ष देणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
दरम्यान, जून २०२२ मध्ये सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ऑक्टोबर महिन्यात आलेल्या पहिल्या दिवाळीत आनंदाचा शिधा संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. एक कोटी ५८ लाख ३३ हजार ७१९ पिवळा व केसरी शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेवर सरकारने ५३० कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. याआधी ‘आनंदाचा शिधा’ या संचात प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता त्यात दोन जिन्नसांची भर पडली आहे. त्यात आता एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील.