
no images were found
काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न – सुप्रिया सुळें
गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. परंतु, सरकार पातळीवर ठोस निर्णय घेतला जात नाही. काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण चालू असताना मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचार उफाळला. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. विविध ठिकाणी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोडही करण्यात आली असून दोन पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी X वर त्यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. परंतु, सरकार पातळीवर ठोस निर्णय घेतला जात नाही. काल (३० ऑक्टोबर) झालेल्या उपसमितीच्या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं या मागणीसाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका मांडली. याचे पडसाद राज्यभर उमटले. तसंच, सत्ताधाऱ्यातील काही नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने अनेकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत मराठा आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचं म्हटलं आहे. तसंच, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत का याबाबत मराठा समाजाने सजग असायला हवं असंही म्हटलं. तसंच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही असाच रोख व्यक्त केला आहे.