
no images were found
हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्यांना हिंदूंचा पाठिंबा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
गोव्यातील अधिवेशनातून प्रारंभ झालेली हिंदु राष्ट्राची मागणी आता जनतेची मागणी बनू लागली आहे, साधू-संत, राजकीय नेते हिंदु राष्ट्राच्या संदर्भात बोलू लागले आहेत. त्यामुळे आता ‘वीज फ्री, प्रवास फ्री’ अशा भुलथापा नकोत, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची ठोस घोषणा हवी आहे. संपूर्ण भारतात गोहत्याबंदी आणि धर्मांतरबंदी कायदे करणे, हिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आणणे, वक्फ आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’सारखे अन्यायी कायदे रहित करावेत, आदी हिंदुहिताच्या मागण्या घोषणापत्रात घेऊन त्या पूर्ण करणार्या लोकप्रतिनिधींना वर्ष 2024 मध्ये होणार्या आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा जाहीर पाठिंबा असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केले.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंनी राजकीय दृष्टीने जागृत न होणे हे हिंदूंच्या पराभवाचे कारण आहे. जागृत, क्रियाशील आणि संघटित नागरिक हीच लोकशाहीची शक्ती आहे. त्यामुळे स्वदेश, स्वातंत्र्य, समाजव्यवस्था यांविषयी हिंदूंचे अज्ञान, स्वार्थ आणि असंघटितपणा यांवर कार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्ष त्यांचे घोषणापत्र जाहीर करतात, आता हिंदूंनी संघटितपणे हिंदुहिताच्या मागण्यांचे घोषणापत्र बनवून मते मागण्यासाठी घरी येणार्या लोकप्रतिनिधीकडे त्यातील मागण्या करायला हव्यात.’’