
no images were found
औरंगाबादच्या नावे वारली वॉलचा विक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
औरंगाबाद : यंदाच्या जी-20 परिषदेचे बहुमान भारताला मिळाले आहे. यानिमित्त औरंगाबाद महापालिकेने कमी वेळात सर्वांत लांब वारली पेंटिंग काढत अनोखा विक्रम केला आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याचे ज्युरी मेंबर रेखा सिंग यांनी जाहीर केले. शहरासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या १२० तरुणींनी महावीर चौकाजवळील एस. टी. वर्कशॉपची भिंत अवघ्या सहा तासांत रंगवली आहे
देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये जी-20 परिषदेचे विदेशी पाहुणे बैठका घेणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात देखील अशीच बैठक होणार आहे. त्यामुळे या विदेशी पाहुण्यांच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरातील विकासकामांना वेग आला आहे. सोबतच शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजता या उपक्रमास सुरुवात झाली. १२० तरुणी महिलांनी एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉप येथील भिंतीवर सहा तासांत वारली पेंटिंगची चित्रे काढली. या भिंतीचा आकार ३ हजार २०० स्क्वेअर फूट आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पुण्यातील सुमारे ३०० ते ४०० कलाकारांनी मिळून २६०० स्क्वेअर फिट इतकी लांब वारली पेंटिंगचा विक्रम केला होता. तो मोडून औरंगाबाद पालिकेने सहा तासांचा रेकॉर्ड केला आहे. पालघर येथून सहा तज्ज्ञ महिलाही यात सहभागी झाल्या होत्या अशी माहिती पथक प्रमुख नंदिनी घोडेले यांनी दिली.
महापालिकेसह इकोत्सव आणि व्हेरॉक यांच्या संयुक्त विद्यमाने हा वारली पेंटिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पेंट ब्रश आणि इतर साहित्य, तसेच जेवण आणि चहापाण्याची व्यवस्था केल्याबद्दल उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, प्रकाश आठवले व इतर कर्मचारी उपस्थित होते