no images were found
आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
मुंबई : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची अडचण होते. कामे वेळेवर होत नाही. याला आवर घालण्यासाठी आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत हजर न राहणे, कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे.
गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे आहे. पण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळेवर हजर राहात नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.
ग्रामसेवक यांची कामाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० असून शनिवार व रविवार या दोन्ही दिवस सुट्टी असते. पण अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक सकाळी ११ वाजल्यानंतर कार्यालयात हजर होतात आणि सायंकाळी ४ वाजल्यानंतर गायब होतात. ग्रामसेवकसह ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वेळेत कधीच उपस्थित नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत सरकारने ही कार्यवाही केली आहे. त्यामुळे आता बायोमेट्रिक मशीन बसल्यानंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळेतच हजर रहावे लागणार आहे.