
no images were found
राजकीय पक्षांच्या अध्यात्मिक आघाड्यांमुळे प्रदूषण : शामसुंदर सोन्नर महाराज
कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा येथे सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून पहिले वारकरी कीर्तन संमेलन घेण्यात आले. यावेळी बोलताना सोन्नर महाराजांनी अध्यात्मिक आघाड्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्याच्या राजकारणात अध्यात्मिक आघाड्या सक्रिय झाल्याने आव्हानाची भाषा होऊ लागली आहे.
महाराज म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्यांमुळे प्रदूषण होत आहे. याकडे लक्ष न देता वारकरी संप्रदायाने आपली परंपरा तसेच चालू ठेवून जबाबदारीने कीर्तन मांडले पाहिजे. संमेलनाची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडी सदगुरु बाबासाहेब आजरेकर नगरीत आल्यानंतर माऊली व तुकोबांच्या गाथा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या संस्कृती लोप पावत चाललेली आहे. ही संस्कृती जपण्यासाठी वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्वागताध्यक्ष आणि आजरा तालुका सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात वारकरी संत साहित्याततील सामाजिक समता यावर परिसंवाद झाला. त्यामध्ये देवदत्त परुळेकर, कॉम्रेड संपत देसाई यांनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. सायंकाळच्या सत्रात दिंडी प्रमुखांचा सत्कार करून सांगता करण्यात आली. गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, राजाभाऊ शिरगुपे, जोश्ना चराटी, अस्मिता जाधव, मुकुंद देसाई आणि गडहिंग्लज आजरा ,चंदगड या भागातील मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होता.