no images were found
‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पोहरा नदी पुनरुज्जीवनासह विविध कामांचा आढावा
नागपूर, : नागपूर शहरात ‘अमृत 2’ अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च 2027 पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शहरात ‘अमृत 2’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या महत्त्वाच्या विषयांवर रामगिरी शासकीय निवास येथे आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस ते बोलत होते. आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्री यांच्या ओएसडी श्रीमती आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ‘अमृत 2’ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम व त्यानंतरच्या पुनर्भरण (restoration) कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम व पुनर्भरणच्या कामाबद्दल समस्या मांडल्या. तसेच नगरसेवकांनी रिंग रोड वरील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामाबद्दलही काही मुद्दे मांडण्यात आले. आमदार श्री. दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती दिली.
यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) सक्तीने अवलंब करावा. भविष्यात शहरात होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून एक सर्वसमावेशक ‘धोरण’ तयार करावे, याशिवाय संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सक्त कारवाई करण्याची ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली.
बैठकीत मनपा आयुक्त डॉ. इटनकर यांनी संगणकीय सादरीकरण करीत ‘अमृत 2’ योजनेच्या कामांसोबतच आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन प्रकल्पावरही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी) बद्दलची माहिती दिली. जयताळा येथे 10 एमएलडी, चिखली येथे 35 एमएलडी एसटीपी उभारण्यात येणार असून, चिंचभवन, बीडीपेठ, सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.