no images were found
महिलांच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी संस्था ठरतेय नवी दिशा, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गोरवोद्गार, गडहिंग्लज शहरात झाला भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा
कोल्हापूर (प्रतिनिधी):-भागीरथी संस्थेमुळे आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली. सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केले. क्रेडीट सोसायटीमुळे हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास कुटुंब आणि समाज अधिक बळकट होईल, असेही ते म्हणाले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अशा संस्था प्रेरणादायी भूमिका बजावत आहेत. भागीरथी संस्था भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. गडहिंग्लज मधील भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
भागीरथी पतसंस्थेचे मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रूपांतर झाले आहे. गडहिंग्लजमध्ये भागीरथी क्रेडीट सोसायटीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन झाले. प्रारंभी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी भागीरथी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टं स्पष्ट केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न अरुंधती महाडिक यांनी पाहिलं आणि त्यासाठी परिश्रम घेतले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आखलेले उपक्रम यशस्वी झाले, असे त्यांनी नमुद केले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नूतन सभासदांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतातून भागीरथी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. २० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज सुमारे ४० हजार महिलांना जोडणारे मानाचे व्यासपीठ बनली आहे. एका वटवृक्षात रूपांतरित झालेल्या भागीरथी संस्थेने, कला-क्रीडा-शिक्षण-आरोग्य-स्वयंरोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांना आत्मनिर्भर केले, असे त्यांनी नमूद केले. गडहिंग्लज शहरात भागीरथी संस्थेची शाखा सुरू होणे अभिमानाची बाब आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध आर्थिक सेवा, कर्जसुविधा आणि मार्गदर्शन केले जाईल, असे खासदार महाडिक म्हणाले. तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा संस्थांची गरज आहे. अरुंधती महाडिक यांनी उभारलेले हे व्यासपीठ नारीशक्तीला विधायक दिशा देईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तर उपस्थित काही महिलांनी भागीरथी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, या संस्थेमुळे आर्थिक भविष्य अधिक सक्षम होईल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, वैष्णवी महाडिक, प्रकाशराव चव्हाण, किसनराव कुराडे, रमेश रिंगणे, बिना कुराडे, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, वंदना खोत, सारिका बटकडली, नागेश चौगुले, शिवाज मगर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.