no images were found
महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे महानगरपालिकेची मान उंचावली : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड
कोल्हापूर, : विद्यार्थ्यांच्या यशाला शिक्षकांच्या कर्तृत्वाची साथ मिळाली की महानगरपालिकेच्या शाळांची मान निश्चितच उंचावते. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या यशातून महापालिका शाळांची गुणवत्ता अधोरेखित होत आहे असे प्रतिपादन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.
महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालय, शाळा क्रमांक ३३ येथे इयत्ता चौथी, पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या यशासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा ‘कौतुक सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. ढोल–ताशे, लेझीम व हलगीच्या निनादात विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा जल्लोष केला. सुशील जाधव यांनी लेझीम पथकाची विशेष तयारी करून घेतली.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवीचे प्रभाकर लोखंडे, सौ. मनिषा पांचाळ व सौ. निता खाडे, इयत्ता पाचवीच्या सौ. सुजाता फराकटे, सौ. राणी शेलार व सुनील परीट, तसेच इयत्ता चौथीच्या सौ. प्रतिभा चौगुले व सौ. सुरेखा पाटील यांचा गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संजय शिंदे व शाळेचे केंद्र मुख्याध्यापक विलास पिंगळे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल इयत्ता चौथीतील १३, इयत्ता पाचवीतील ११ आणि इयत्ता सातवीतील ९, अशा एकूण ३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती सौ.शीला सोनुले, उपसभापती सौ. पूजा पोवार, सदस्या सौ. माधुरी व्हटकर, प्रशासनाधिकारी सौ. जयश्री जाधव, नगरसेवक सचिन शेंडे, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, संजय शिंदे, दिलीप शिरगावे व विलास पिंगळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मनिषा पांचाळ यांनी केले, तर आभार प्रभाकर लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.