no images were found
पुणे,: सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरुंचा विक्रम मोडणारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंत कार्यकाळ देशवासियांसाठी अत्यंत समाधानकारक आणि भारताला स्थैर्य देणारा राहीला. सलग ४,३९९ दिवस सत्तेत राहणारे ‘नमों’चा कार्यकाळ पारदर्शक प्रशासन, जनकल्याणकारी निर्णयावर भर देणारा आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.११) केले.
गेल्या दशकभरात केंद्र सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) आणि डिजिटल पेमेंट व्यवस्थेमुळे सरकारी योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून, यांमुळे मध्यस्थांची साखळी आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. सरकारी कंत्राटे आणि लिलाव प्रक्रियेत ‘ई-टेंडरिंग’ प्रणाली लागू केल्याने प्रशासकीय पातळीवरील गैरव्यवहार कमी झाले आहेत, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
‘आयुष्मान भारत’ योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोफत उपचारांची सुविधा आणि ‘पंतप्रधान आवास योजने’द्वारे लाखो बेघरांना हक्काची घरे मिळाली आहेत. ‘पीएम किसान सन्मान निधी’ अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पाठवली जातेय. रस्ते, रेल्वे आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा देशभरात वेगाने विस्तार करण्यात आला असल्याचे पाटील म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या रूपाने देशाला अनेक दशकांनंतर एक मजबूत राजकीय इच्छाशक्ती असलेले नेतृत्व लाभले आहे, ज्यांनी केवळ राजकीय गणिते न मांडता देशाच्या दीर्घकालीन हिताचे धाडसी निर्णय घेतले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताला प्राधान्य देणारे हे १२ वर्षे म्हणजे प्रामाणिक आणि कणखर नेतृत्वाचा सुवर्णकाळ ठरला आहे, ज्याने भारताला जागतिक स्तरावर एक नवी दिशा दिली, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.