no images were found
कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर
पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले.
विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.