no images were found
डिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकर:पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात अर्थसंकल्पावर व्याख्यान
कोल्हापूर ( प्रतिनिधी):भारत जगातील गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अर्थसंकल्पात पावले उललली गेली आहेत. येत्या पाच वर्षांत डिजिटल आशय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होईल, तसेच एआय, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट आदी क्षेत्रात सर्वाधिक संधी निर्माण होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. केदार मारुलकर यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात डॉ. मारुलकर यांचे ‘माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला बजेटने काय दिले?’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सुभाष कोंबडे होते.
डॉ. मारुलकर म्हणाले, माध्यम आणि मनोरंजन उद्योग येत्या काळात आणखी वाढेल असे संकेत आहेत. विशेषतः डिजिटल आशय निर्मितीत भारत आघाडी घेईल. पुढच्या पाच वर्षात भारतीय पद्धतीचे एआय तंत्रज्ञान विकसित करुन ते जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. गतवर्षापासून एआयवर केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष जोर दिला जात आहे. मनोरंजनाशी संबंधित डिजिटल आशय निर्मितीत पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न होत आहे. अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट असे नवीन क्षेत्र उदयास येत आहे. या क्षेत्रात रोजगाराची संधी अधिक असू शकतात.
केंद्रीय अर्थसंकल्पात लघु आणि मध्यम क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. महिलाकेंद्री उद्योगांनाही प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संरक्षण क्षेत्रात सरकार जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहे. असे असले तरी देशातील वाढती विषमता आणि बेरोजगारी या प्रश्नांना भिडण्यासाठी अर्थसंकल्प कमी पडतो. अर्थसंकल्पात कोणताही लोकानुनय नसला तरी विषमतेची दरी कमी करण्यासाठी ठोस उपाय त्यात दिसत नाहीत. संपूर्ण लोकसंख्येला उचित न्याय मिळण्याची सोय केल्याशिवाय अर्थसंकल्पातून ठोस काही हाती लागणार नाही, असे डॉ. मारुलकर म्हणाले.
प्रा. डॉ. सुभाष कोंबडे म्हणाले, भारताला विकसनशील राष्ट्रापासून विकसित राष्ट्राकडे घेऊन जाण्यासाठी सरकार नेटाने प्रयत्न करत आहे. नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. शिवाय जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल अशा उद्योगांना पाठबळ दिले पाहिजे. यंदाच्या अर्थसंकल्पात याची काळजी घेतली आहे शिवाय कृषि प्रक्रिया उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, महागाईचा दर नियंत्रित ठेवणे आणि चलनाचे अवमूल्यन रोखणे सर्वात मोठे आव्हान असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री शिंदे हिने तर समृद्धी मोदक हिने पाहुण्यांची ओळख करुन दिली. उद्देश पाटील याने आभार मानले.