no images were found
कवितेमुळे माणूस म्हणून विचार करता येतो : प्रा. श्यामसुंदर मिरजकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कविता ही मानवतेची सर्वात सुंदर परिभाषा आहे. कविता स्वतःकडे दुसऱ्याच्या नजरेने पाहायला शिकवते. कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर घटना आणि अनुभूतीला संवेदनशीलतेची जोड मिळाल्याने उत्तम कवितेची निर्मिती होते. कवितेमुळे समाजात जगताना माणूस म्हणून विचार करता येतो, असे मत प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग येथे ‘लेखक संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. नंदकुमार मोरे होते.
ते म्हणाले, कवीची प्रगती जाती-धर्माच्या भिंतीत होत नाही. त्यासाठी त्याला सामाजिक व्हावे लागते. हा विकास वाचनातून होतो. वाचन हे अंधारून आलेल्या काळात उजेडासारखे असते. फुलून येणाऱ्या क्षणांची सोबत असते. हे सर्व कवितेमुळे लक्षात येते. खरे तर जीवनाचा तोल सांभाळण्याचे काम कविता करते. यावेळी त्यांनी ‘इचलकरंजी कविता’, ‘दुखणं’ व ‘एक सेल्फी मित्रासोबत’ या कविता सादर केल्या.
मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. भक्ती नाईक यांनी सूत्रसंचालन केले. ऋणाली नांद्रेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुखदेव एकल, संशोधक विद्यार्थी, एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.