no images were found
थेट फडणवीसांनी लक्ष घातलं, आता महादेवी परतणार?
कोल्हापूर : नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. जनभावना लक्षात घेता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं आहे.
नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
जनभावना लक्षात घेता आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महादेवी हत्तीण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, तसंच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांसह जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, महादेवी हत्तीणी संदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हत्तीण संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर जनभावना तीव्र झाल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री फडणवीस काही सकारात्मक तोडगा काढणार का याकडे संपूर्ण कोल्हापुरकरांचे डोळे लागले आहेत.
तर तिकडे महादेवीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट अंबानीच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ कार्ड बहिष्कार घातला आहे. शिवाय हजारो नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांच्या रेट्यापुढे वनतारा झुकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.