
no images were found
कोल्हापूरकरांचे स्वप्न सत्यात उतरले – सतेज पाटील
कोल्हापूर : शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनमधून आलेले पाणी काल शुक्रवार पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी पोहोचले आणि कोल्हापूरकरांनी ३० ते ३५ वर्षे केलेली मागणी अखेर आज पूर्णत्वाला गेली.
यंदाच्या दिवाळीला अभ्यंगस्नानासाठी अखेर पाणी आले. कोल्हापूरकरांना दाखविलेले हे स्वप्न सत्यात उतरत असताना आमदार सतेज पाटील यांच्या भावनांचा बांध आज फुटला. आमदार पाटील यांच्यासह आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पाणी पूजन केले आणि उपस्थितांनी हलगी-घुमक्याच्या तालावर गुलालांची उधळण करत जोरदार जल्लोष केला.कोल्हापुरात १९८७ मध्ये काविळीची साथ येऊन त्यामध्ये दोन गर्भवतींचा मृत्यू झाला. त्यानंतर कोल्हापूर शहरासाठी स्वच्छ आणि शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवण्याचा प्रश्न समोर आला. त्यानंतर हा विषय अनेकांसाठी राजकीय अजेंडा बनला; मात्र २०१४ पासून या प्रश्नाला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
निवडणूक प्रचारात आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांसाठी काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनच्या माध्यमातून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवणारच, अशी प्रतीज्ञाच केली आणि आज अखेर ती पूर्णत्वाला नेली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेच्या लोकार्पणाचा दिमाखदार सोहळा लवकरच होणार आहे. मात्र, तत्पूर्वी टप्प्याटप्प्याने पंपांची चाचणी घेत चार पंप सुरू केले जाणार आहेत. त्यापैकी आज एका पंपातून पाणी उपसा सुरू करण्यात आला. त्यातील पाणी शहराच्या काही भागात सोडण्यात येणार आहे.शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेतूनच पाणी दिले पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापूरने प्रदीर्घ लढा दिला. साधारणतः १९८९ पासून त्याला आणखी चालना मिळाली. तेव्हापासून २०१४ पर्यंतच्या ३४ वर्षांच्या कालावधीत विविध चर्चा झाल्या, प्रस्ताव तयार केले गेले, त्यात सुधारणा केली गेली; पण मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. २७ ऑगस्ट २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजन झाले. कामाला सुरुवात झाली असली तरी धरण क्षेत्रात जॅकवेल उभारणीपासून शहरापर्यंत पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी परवानगी नसल्याने काम रखडले होते. त्यासाठी राज्यापासून केंद्र सरकारकडे मोठा पाठपुरावा करावा लागला. त्यामध्ये सत्ता बदलाचाही मोठा परिणाम झाला. परवानगी मिळाल्यानंतर धरण क्षेत्रात जॅकवेल उभारणीसाठी दरवर्षी येत असलेल्या पाण्याची मोठी अडचण होती. ती दूर झाल्यानंतर ४६ मीटर खोल केलेली खोदाई, त्यात उतरून करावे लागणारे काम, बाजूचा ढासळणारा डोंगर, अशी आव्हानेही ठेकेदार कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी झेलली. त्याशिवाय सोळांकूर गावातून पाईपलाईन टाकण्यात येत असताना त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. त्यांना राजी करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांपासून जलअभियंत्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या कित्येक फेऱ्या झाल्या.
तसेच काळम्मावाडीच्या कालवा बाजूने सोळांकूरपर्यंत पाईपलाईन टाकताना डोंगरातून, वनविभागाच्या हद्दीत पाईप टाकण्याचे मोठे आव्हान होते. दुसऱ्या बाजूला राजकीय विरोधकांकडून योजनेतील गैरव्यवहाराबाबत आरोप केले जात होते. या पार्श्वभूमीवर योजना साकारली आहे. पाणीपूजनावेळी माजी महापौर अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, संजय मोहिते, अर्जुन माने, भूपाल शेटे, दीपा मगदूम, विजय सूर्यवंशी, सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार आदी उपस्थित होते. जल्लोष, आतषबाजी आणि भावुकताहीदिवसभरात केव्हा पाणी येणार, याची प्रतीक्षा करत थांबून असलेल्या कार्यकर्त्यांना दहा वाजून ५० मिनिटांनी जल्लोषाची संधी मिळाली. फिल्टर हाउसमध्ये हळूहळू वाढत जाणारी पाण्याची पातळी पाहून कार्यकर्त्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली. पाणी ओसंडणार त्याचवेळी आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव आणि कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आणि नगरसेविका तेथे पोहोचल्या. त्यानंतर सतेज पाटील यांनी श्रीफळ अर्पण करून नतमस्तक होऊन जलपूजन केले. यावेळी ते काही काळ भावुक झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या विजयाच्या घोषणांबरोबरच ‘पाणी आमच्या हक्काचे…’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्यामुळे २०१४ मध्ये २२५ कोटींच्या या योजनेला मान्यता मिळाली. योजना प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी आल्या; पण शेवटी कोल्हापूरकरांना स्वच्छ पाणी मिळावे, हे स्वप्न अंबाबाईच्या कृपेने पूर्ण होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या योजनेमागे लाखो कोल्हापूरवासीयांच्या सदिच्छा होत्या, सकाराकत्मक भावना होती. त्यातूनच ऊर्जा मिळाली आणि ती मदतीची ठरली.