
no images were found
मूर्तीच्या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवणार ! – जिल्हाधिकारी
कोल्हापूर – पुरातत्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करावेत. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत नसेल, तर श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्ती पालटण्याच्या संदर्भात धर्माचार्य, करवीरपीठ-शृंगेरी पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे. मूर्ती पालटण्याच्या संदर्भात ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या कृती तात्काळ चालू कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देवीभक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने 17 मार्चला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. ‘मूर्तीच्या संदर्भात सर्व अहवाल सिद्ध करून आम्ही शासनाकडे पाठवणार आहे, त्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल’, असे जिल्हाधिकार्यांनी देवीभक्त सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले.
या प्रसंगी दशनाम गोस्वामी आखाड्याचे हिंदु धर्मगुरु आणि आंतरराष्ट्रीय योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी, सचिव डॉ. सुशील अग्रवाल, ‘रोखठोक’चे संपादक डॉ. सुरेश राठोड, ‘देवीभक्त सकल हिंदू समाजा’चे सर्वश्री शरद माळी, राजू यादव, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत..
1. हिंदु धर्म शास्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अभिषेक बंद असल्याने देवीभक्तांना घास घशाखाली जात नाही, अशी स्थिती आहे. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा पुरातत्व विभागाने दिल्याने आता मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू करण्यास कोणतीच अडचण नसावी. तरी या संदर्भात श्री महालक्ष्मी देवस्थानचे प्रशासक म्हणून जबाबदारी असलेले सध्याचे कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात आढावा घेऊन सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि देवीभक्तांच्या श्रद्धांचे संवर्धन कसे होईल, याचा विचार करून मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा तात्काळ चालू करावी.
2. जरी मूर्ती चांगली आहे, असा निर्वाळा पुरातत्व विभागाने दिला असला तरी या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमधून, तसेच काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे याविषयी देवीभक्तांकडे संभ्रम आहे. त्यामुळे वर्ष 2015 मध्ये झालेले रासायनिक संवर्धन योग्य झाले नाही कि मूर्तीची स्थिती चांगली नाही, याविषयी प्रश्नचिन्ह असून त्याचे उत्तर अद्याप देवीभक्तांना मिळालेले नाही. याविषयी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने खुलासा होणे आवश्यक आहे.
3. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत नसेल, तर तसे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी यांनी द्यावे आणि श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्ती पालटण्याच्या संदर्भात धर्माचार्य, करवीरपीठ-शृंगेरी पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे. मूर्ती पालटण्याच्या संदर्भात ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या कृती तात्काळ चालू कराव्यात.