no images were found
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे
कोल्हापूर, : सन 2026 च्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष गजानन गुरव यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 17 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुका, जिल्हा तसेच राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी मंडळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना पारंपरिक कला, गायन, वादन, नृत्य, नाट्य व लोककलेचे सादरीकरण, सांस्कृतिक वारशाशी संबंधित प्रदर्शन, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम, वन, निसर्ग, गडकिल्ले व राष्ट्रीय-राज्य स्मारकांचा प्रचार-प्रसार, महिला, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक व दिव्यांगांसाठीचे उपक्रम, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान व सामाजिक जनजागृतीशी संबंधित उपक्रमांचा विचार करण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट, ध्वनी, वायू व जलप्रदूषणविरहित परिसर, स्वच्छता, गणेशभक्तांसाठी पाणी व प्रथमोपचारासह आवश्यक प्राथमिक सुविधा, ‘एक गाव एक गणपती’सारखे विधायक उपक्रम तसेच मंडळाच्या कार्यकारिणीत महिलांचा सहभाग या बाबींचाही विचार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शहर, गाव, वाड्या, वस्त्या, प्रभाग, ग्रामपंचायत क्षेत्र तसेच दुर्गम भागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत व्यापक प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे.
नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मंडळांनी आपल्या उपक्रमांची योग्य नोंद ठेवून आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे व व्हिडिओ उपलब्ध ठेवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.