no images were found
कोतवडे प्रभाग समितीच्या बैठकीत स्मार्ट मीटर जनजागृती; नागरिकांच्या शंकांचे सविस्तर निरसन
रत्नागिरी : कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची बैठक माळगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीस प्रभागातील सर्व ११ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश साळवी हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. स्वप्निल (तारक) मयेकर, पंचायत समिती सदस्या सौ. पूर्वा दुर्गवळी, पंचायत समिती उपाध्यक्ष तसेच मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच खेऊर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, बांधकाम, कृषी, वीजपुरवठा आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या कामांचा आढावा सादर केला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे देत शंकांचे निरसन केले.
बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते स्मार्ट मीटर विषयावरील जनजागृती सत्र. महावितरणचे शाखा अभियंता श्री. राहुल देशमुख व एएमआयएसपी प्रकल्पप्रमुख श्री. सुधाकर विदे यांनी स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे, अचूक बिलिंग, रिअल-टाइम वीज वापराची माहिती, दूरस्थ मीटर रीडिंग, तांत्रिक सुरक्षितता तसेच ग्राहकांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सभागृहातील नागरिकांनी स्मार्ट मीटर संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. त्यास महावितरण आणि एएमआयएसपी च्या अधिकाऱ्यांनी तथ्याधारित व तांत्रिक माहितीच्या आधारे समाधानकारक उत्तरे देऊन सर्व शंकांचे निरसन केले. उपस्थित नागरिकांनी या माहितीपूर्ण उपक्रमाचे स्वागत करत अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज व्यक्त केली.
प्रभाग समितीच्या पुढाकारामुळे आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती कार्यक्रमामुळे स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये असलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत झाली. नागरिकांना वस्तुनिष्ठ व तांत्रिक माहिती मिळाल्याने स्मार्ट मीटरविषयी विश्वास आणि जागरूकता वाढण्यास या उपक्रमाचा निश्चितच सकारात्मक फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.