no images were found
हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी ‘प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये’ विषयावर उद्बोधन वर्ग
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने समूह जनजागृती कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठातील हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी ‘प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये’ या विषयावरील उद्बोधन वर्गाचे आयोजन शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मानव्यविद्या सभागृहात करण्यात आले आहे,अशी माहिती उपकुलसचिव श्री. विनय शिंदे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) आणि ऑनलाईन एम.बी.ए. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठातील हंगामी कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देणे, त्यांच्यामध्ये उच्च शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि कौशल्यविकासाला चालना देणे, या उद्देशाने या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर हे ‘शिवाजी विद्यापीठ आणि संवाद कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील हे ‘प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या उद्बोधन वर्गाचा लाभ घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील सर्व हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपकुलसचिव श्री. विनय शिंदे यांनी केले आहे.