no images were found
उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले वैफल्यग्रस्त; त्यांना मानसोपचाराची अत्यंत गरज : शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव
कोल्हापूर : दुसऱ्याला एक बोट दाखविताना आपलीच चार बोटे आपल्याकडे असतात हे उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले विसरले आहेत. स्वत:च्या हप्तेवसुली कार्यालयाच्या दारातील अनधिकृत शेड, टाकाळा खण परिसरातील अनधिकृत कार्यालय, त्यांच्या टोळक्यातील व्यक्तींनी केलेली अनधिकृत बांधकामे त्यांना अधिकृत वाटतात आणि जनतेची सेवा करणारी शिवसेनेची कार्यालये त्यांच्या डोळ्यात खुपत असून, शिवसेना द्वेषातून त्यांनी खोटे आरोप करण्याचे, व्हिडीओ करून प्रसिद्धी मिळविण्याचे उद्योग सुरु केले आहे. रविकिरण इंगवले हे वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांना चांगल्या मानसोपचाराची अत्यंत गरज असल्याची टीका शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव यांनी केली. राजगड शिवसेना विभागीय कार्यालय शिवाजी पेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा स्वभाव अत्यंत विकृत आहे. ऐनकेन प्रकारे काहीही व्हिडीओ, कॉल रेकोर्डिंग व्हायरल करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, हेच त्यांचे उद्योग आहेत. सद्या ते वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. राजगड हे सर्वसामान्यांच्या हक्काचे, समाजसेवेचे स्थान आहे, हे जनतेला माहित आहे. शिवसेनेचे विभागीय कार्यालय येथून निराधारांना आधार देण्याचे काम केले जाते, त्यामुळे हे जनतेसाठी समाजसेवा केंद्र आहे. विविध शासनाच्या योजनांचा लाभ देणे असो वा रक्तदान असेल, वैद्यकीय मदत, शाळा कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थ्यांना विनाडोनेशन प्रवेश, असे अनेक सामाजिक काम याच ठिकाणाहून केली जाते. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण या कार्यालयातून केले जाते.
कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची नाहक बदनामी करून प्रसिद्धी मिळविण्याचेच फक्त उद्योग रविकिरण इंगवले आणि त्यांच्या टोळक्याकडे शिल्लक राहिले आहे. या विकृत व्यक्तीने निवडणुकीत आमदार राजेश क्षीरसागर यांची इतकी बदनामी करूनही “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” या म्हणी प्रमाणे त्याचा काडीमात्र फरक आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निकालावर पडला नाही. उलट जनतेने आमदार राजेश क्षीरसागर यांचे काम पाहून त्यांना ३० हजारांच्या मताधिक्याने विजयी केले. पण याउलट रविकिरण इंगवले यांच्या विकृत मानसिकतेमुळे स्वत:च्या भावाला त्यांना निवडून आणता आले नाही. जनतेने त्यांना दिलेल्या या चपराकेतून त्यांनी बोध घेवून स्वत:च्या स्वभावात सुधारणा करावी. यापुढे जर शिवसेनेच्या नादाला लागाल तर याद राखा असा, इशाराही दिला.
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे यांनी, रविकिरण इंगवले हे जाणीवपूर्वक वैयक्तिक विरोधातून बिनबुडाचे आरोप करत आहेत. संध्यामठ येथील शिवसेनेचे कार्यालय हे स्वमालकीच्या जागेत असतानाही त्यांनी अतिक्रमण असल्याचा खोटा आरोप केला. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.
जग चंद्रावर आणि पांडू डोंगरावर अशी रविकिरण इंगवले यांची अवस्था : जाधव
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून आय.टी.पार्क, कन्व्हेन्शन सेंटर, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रंकाळा तलाव सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम अशी अनेक कामे होत आहेत. परंतु, स्वत:चे काहीही कर्तुत्व नसताना काम करणाऱ्या व्यक्तीवर जाणीवपूर्वक टीका करून खोटी प्रसिद्धी मिळविण्याचे काम रविकिरण इंगवले करत आहे. त्यामुळे जग गेले चंद्रावर आणि पांडू अजूनही बसलाय डोंगरावर अशी रविकिरण इंगवले यांची अवस्था झाली असल्याचा उपहासात्मक टोला शहरप्रमुख रणजित जाधव यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, नगरसेवक अजय इंगवले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, अमित चव्हाण, निलेश गायकवाड, सचिन राऊत, कपिल सरनाईक, योगेश चौगले, शुभम शिंदे, अर्जुन संकपाळ, मयूर साळोखे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.