no images were found
कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी २४ जागांसाठी तब्बल पावणेचार हजारांवर अर्ज दाखल
कोल्हापूर : जिल्ह्यातील केवळ २४ जागांसाठी तब्बल पावणेचार हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस असल्याने यामध्ये आज आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार हजारांहून अधिक उमेदवार भरतीसाठी असण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. एका जागेसाठी तब्बल ८० उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. दरम्यान, सध्या होत असलेल्या पोलिस भरतीत तृतीयपंथीयांना संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. पोलीस भरतीमध्ये उच्च न्यायालयाने तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत 9 डिसेंबर रोजी आदेश दिले होते. त्यामुळे तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर ‘तृतीयपंथीय’ हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार गृह विभागाने पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान, दुसरीकडे, राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. बऱ्याच कालावधीनंतर राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली होती. मात्र, भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सातत्याने हँग होत असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत होती. त्यामुळे अस्वस्थता वाढत चालली होती. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. पुढील काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती.