no images were found
आपण केंद्रात आणि राज्यात केलेली कामे सांगा-रविंद्र चव्हाण
नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे बारा लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान पन्नास हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचे प्रमोशन करावे अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.
नागपुरात मंचावर राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, भाजप आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी असताना या कानपिचक्या त्यांनी दिल्या आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी प्रथमच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता त्याची आठवण करून देत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्व विदर्भात दोन दिवसांत सहा बैठका घेतल्या.
नागपूर च्या एअरपोर्ट बँकवेट हॉल येथील आपल्या दौऱ्याच्या अंतिम बैठकीत नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा येथील प्रमुख भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वात आधी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का..आपली तशी इच्छा आहे का..असा सवाल टाकत रवींद्र चव्हाण यांनी सर्व उपस्थितांची विकेट घेतली.डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपल्यापैकी किती जणांची सक्रिय उपस्थिती असते असे पुढे सवाल करत त्यांनी सर्व उपस्थितांना अंतर्मुख केले..आणि आपण सोशल मीडियावर कमी पडतो, असे सरळ स्पष्ट विधान करून कानपिचक्या दिल्या.